
माहूर / वाई बा जिल्हा परिषद प्रभाग रचनेवर आक्षेप न्यायालयात जाणार :- ज्योतीबा खराटे
श्रीक्षेञ माहूर -ग्रामीण प्रतिनिधि
संतोष नीलकंठवार
गत तीन वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
अनुषंगाने गट व गणांचा प्रारूप प्रभाग रचना दि.१४ रोजी जाहीर करण्यात आली. तालुक्यात वाई बाजार व वानोळा हे दोन गट राहणार असल्याने या दोन्ही गटातील व चार गणाचा
समावेश असलेल्या गावानिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली असून यात वाई (बा) गटातील अंजनखेड हे गाव वानोळा गटात तर रुई हे वानोळा जिल्हा परिषद गटातील गाव वाई गटात समावेश करण्यात आल्याने शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख ज्योतीबा खराटे हे प्रभाग रचनेवर आक्षेप घेणार असून वेळ प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
राजकीय व सामाजिक क्षेत्रात आज ही दबदबा कायम असलेले शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख ज्योतीबा खराटे ज्या गटातुन जिल्हा परिषद निवडणूक लढवितात त्याच वाई बाजार गटात त्यांचे अंजनखेड गाव होते परंतु आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने गट व गणांची प्रभाग रचना यादी जाहीर करण्यात आली मात्र गत अनेक वर्षांपासून अंजनखेड हे गाव वाई बाजार गटात असते ते मात्र प्रभाग रचनेत खराटे यांना शह देण्यासाठी
वानोळा जि. प. गटात फेकले तर नाही ना ? असा प्रश्न राजकीय जानकारातुन व्यक्त केला जात असला तरी प्रभाग रचनेसाठी सन २०१७ चा निकष असल्याने जी गावे २०१७ मध्ये ज्या गटात होती ती गावे त्याच गटात राहणे अपेक्षित होते.विशेष म्हणजे अंजनखेड हे गाव २०१२,२०१७, व २०२२ मध्ये झालेल्या निवडणुका व प्रभाग रचनेत वाई बाजार गटातच होते, माहुर निवडणूक विभागाने नामी शक्कल लढवून मागील अनेक पंचवार्षिक वाई गटात आलेल्या अंजनखेड गावचा वानोळा गटात समावेश केला आहे.
माहूर निवडणूक प्रशासनाने हे काम आपल्या मर्जीने केले नसावे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हा फेरबदल कोणाच्या सांगण्यावरून व दबावाखाली करण्यात आला याची मला कल्पना असून मी हरकती दाखल करत न्यायालयाचे दार ठोठवणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी दिली आहे.



