वीज ग्राहकांच्या जागृतीसाठी ढाणकीत महावितरणची धडाकेबाज ‘जनजागृती रॅली’
स्मार्ट मीटर आणि सौर ऊर्जेचा वापर करण्याचे महावितरणचे आवाहन
ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे
वीज ग्राहकांमध्ये शासनाच्या विविध योजनांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वीज देयकांच्या नियमित भरण्याबाबत प्रोत्साहन देण्यासाठी, महावितरणच्या वतीने आज, १३ फेब्रुवारी २०२६ रोजी ढाणकी शहरात भव्य ‘जनजागृती रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान आणि वीज बचतीचा संदेश घरोघरी पोहोचवण्यात आला.
महावितरण उपकार्यकारी अभियंता जाधव साहेब, ढाणकी सहाय्यक अभियंता राहुल नाकले, साखरा सहयक अभियंता पवन गिरी, माजी सहाय्यक अभियंता अनिल वानखेडे , संजय पडोळे , गजानन राजटकर, चंद्रभान बाभळे , सय्यद रफिक , रवींद्र दवणे, सुनील कांबळे, कृष्णा गायकवाड, कृष्णा कत्तुलवाड, आठवले मॅडम, सय्यद सलीम, काळबांडे साहेब, सुरोशे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली व इतर कर्मचारी उपस्थित होते शहराच्या मुख्य भागातून निघालेल्या या मोटरसायकल रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. महावितरणच्या सर्व स्तरांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या रॅलीदरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना
नियमित वीज बिल भरणा: अखंडित वीज पुरवठ्यासाठी वीज बिलाचा वेळेवर भरणा करणे कसे आवश्यक आहे, याबाबत आवाहन करण्यात आले. भविष्यात येणाऱ्या स्मार्ट मीटर प्रणालीमुळे ग्राहकांना होणारे फायदे आणि पारदर्शकता यावर प्रकाश टाकण्यात आला, बिलातून कायमस्वरूपी सुटका मिळवण्यासाठी शासनाच्या ‘सोलर रूफ टॉप’ योजनेची माहिती देऊन जास्तीत जास्त नागरिकांनी सौर ऊर्जेचा वापर करावा, असे सांगण्यात आले., वीज वापरताना घ्यायची सुरक्षितता आणि विजेचा अपव्यय टाळून राष्ट्रीय बचत कशी करता येईल, याचे मार्गदर्शन करण्यात आले.
शहरातील प्रमुख मार्गावरून फिरताना “वीज वाचवा – देश वाचवा”, “नियमित बिल भरा – सहकार्य करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. महावितरणच्या या उपक्रमाचे ढाणकी शहरातील नागरिकांनी स्वागत केले असून, अशा उपक्रमांमुळे ग्राहक आणि महावितरण यांच्यातील संवाद वाढण्यास मदत होईल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.




