जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ‘तोहीत अहमद’ बनले अग्निवीर; दुःखाचा डोंगर पचवून लदाखच्या सीमेवर बजावणार कर्तव्य
ढाणकी (प्रतिनिधी):मिलिंद चिकाटे
अत्यंत हलाखीच्या आणि गरिबीच्या परिस्थितीवर मात करत जिद्दीच्या जोरावर उमरखेड येथील तरुण तोहीत अहमद शेख आयुब यांची भारतीय सैन्यात ‘अग्निवीर’ म्हणून निवड झाली आहे. नागपूर येथे आपली ६ महिन्यांची खडतर ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर आता ते देशसेवेसाठी थेट लदाखच्या सीमेवर कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज झाले आहेत.
तोहीत अहमद यांचे कुटुंबीय तरकारी (भाजीपाला) विकून आपला उदरनिर्वाह चालवतात. घरची गरिबी आणि तुटपुंजी साधने असतानाही तोहीत यांनी मनात देशसेवेची ध्येयधुरा बाळगून आपले शिक्षण पूर्ण केले आणि सैन्यात भरती होण्याचे आई-वडिलांचे स्वप्न साकार केले.
विशेष म्हणजे, या खडतर ट्रेनिंगला जाण्यापूर्वीच त्यांच्या छत्रछायेसारख्या पाठीशी असणाऱ्या आईचे दुःखद निधन झाले होते. आईच्या जाण्याने दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असतानाही, तोहीत यांनी स्वतःला सावरले आणि आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने ट्रेनिंग पूर्ण केले. दुःखावर मात करत मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांचा हा प्रवास ग्रामीण भागातील तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.
अग्निवीर म्हणून निवड झाल्याबद्दल आणि नागपूर येथील ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी तोहीत अहमद यांचा विशेष सत्कार करून पुढील यशस्वी वाटचालीस व देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर काँग्रेस नेते शेख जब्बार व सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल चिकाटे यांनीही तोहीत यांचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल उमरखेड व ढाणकी परिसरातून तोहीत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



