आरोग्य कर्मचाऱ्यानी जीव धोक्यात घालून पुरविली आरोग्य सेवा.
प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे
उमरखेड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पैनगंगा नदीकाठच्या गावांमध्ये पुराने थैमान घातले असून अनेक शेत शिवारे आणि नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यातच तालुक्यातील संगम चिंचोली या गावाला जोडणाऱ्या पुलावर जवळपास 25 ते 30 फूट वर पाणी आल्यामुळे गावाचा संपर्क तुटला असून दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली असताना देखील प्राथमिक आरोग्य केंद्र विडूळ येथील आरोग्य पथकाने आपल्या जीवाची परवा न करता कुठल्याही प्रकारच्या सुरक्षे शिवाय एका खाजगी रुखच्या मदतीने तीस फूट पाण्यावरून जवळपास एक किलोमीटर पाण्यातून प्रवास करून गावातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्याचे काम केले आहे.
सदर आरोग्य पथकाने पूरग्रस्त भागातील सर्वेक्षण करून मंदिरात ओपीडी काढून आरोग्य सेवा दिली आहे तसेच दोन गरोदर महिलांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी पोहोचण्याचे काम पथकाने केले आहे.
वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयराम बस्सी व डॉक्टर धनंजय वटाणे यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश पवार, आरोग्य सहाय्यक प्रल्हाद मस्के, विठ्ठल तावडे, आरोग्य सेवक अतीश काळबांडे, आरोग्य सेविका पुजा तरटे यांनी आपल्या जीवाची परवा न करता केलेल्या त्यांच्या या कार्यासाठी त्यांच्यावर सर्व स्तरावरून कौतुकांचा वर्षाव होत आहे.




